भूमिपुत्रांचे बाबासाहेब : समाजाला आत्मभान देणारी कविता. डॉ. कैलास दौंड

 


• भूमिपुत्रांचे बाबासाहेब : समाजाला आत्मभान देणारी कविता.

                                 डॉ. कैलास दौंड

   
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महान  कार्य भारतातील सर्व माणसाच्या उन्नतीचे आणि सर्वांगीण  प्रगतीचे आहे, सामाजिक समतेचे आणि विषमता निर्मुलनाचे आहे. त्यांचे संपूर्ण जीवनच समाजासाठी समर्पित होते. त्यामुळे अनेकांनी त्यांच्या कार्याला समजून घेत त्यावर ग्रंथनिर्मिती केली आहे. मुळातच महाकाव्याचा विषय असणाऱ्या  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधाने  काहींनी काव्यग्रंथही निर्माण लिहीले आहेत. भूमिपुत्रांचे बाबासाहेब ही कवी चंद्रशेखर मलकमट्टे यांची दीर्घ कविता १४ एप्रिल २०१० रोजी पुण्यातील सुविद्या प्रकाशनाने प्रकाशित केली असुन तिची दुसरी आवृत्ती १४ ऑक्टोबर २०२० रोजी ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशित केली आहे." डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर बहुजन - ओबीसींसाठी जे कार्य केले ते लोकांसमोर यावे या हेतुने ' भूमिपुत्रांचे बाबासाहेब ' हे दीर्घ काव्य लिहीले " असे कवीने मनोगतात लिहीले आहे. भूमिपुत्रांना अंतर्मुख करणारी कविता असे या कवितेला संबोधता येइल.
     प्रसिद्ध कवी यशवंत मनोहर यांची एकवीस पृष्ठाची 'बाबासाहेबांच्या करूणेचे अथांग तारांगण' या शीर्षकाची प्रस्तावना कवी मलकमपटटे यांच्या दीर्घ कवितेची बलस्थाने दर्शवणारी आहे.प्रस्तुत दुसर्‍या आवृत्तीत पहिल्या आवृत्तीची डाॅ. रावसाहेब कसबे यांनी लिहीलेली प्रस्तावनाही समाविष्ट केलेली आहे. या प्रस्तावनेच्या शेवटी डाॅ. कसबे यांनी 'चंद्रशेखर मलकमट्टे यांची कविता म्हणजे या नव्या सुज्ञ पिढीच्या आगमनाची चाहूल आहे. जिच्या आगमनाची उत्कंठतेने वाट पाहिली ती सूज्ञ पिढी सामाजिक, आर्थिक क्रांतीसाठी पुढे येत आहे याचा मनस्वी आनंद आहे. ' असे अत्यंत स्वागतशील आणि मौलिक विधान केलेले आहे. ते औचित्यपूर्ण आणि महत्त्वपूर्ण आहे.
       'भूमिपुत्रांचे बाबासाहेब' ही ७७ पृष्ठाची २० भागातील कविता डॉ. बाबासाहेबांनी दलितेतरांसाठी केलेल्या काही कार्याला उजागर करणारी आहे. वास्तवात प्रज्ञासूर्याला   पूर्णांशाने समजून घेणे हे मोठे अवघड आणि आव्हानात्मक काम आहे. ही कविता तो प्रयत्न करते. या कवितेच्या सुरुवातीलाच हैद्राबाद संस्थान मुक्तीला डाॅ. बाबासाहेबांनीच 'पोलिस ॲक्शन'  हे नाव दिले होते आणि स्वतंत्र भारताचे वकिल म्हणून त्यांनी कामही केले होते असे कवी नोंदवतो.
     ' जिरवून निजामाला मुत्सद्देगिरीच्या आखाड्यात
      तुम्ही आणलीत आबादानी
जिथवर पसरलं होतं हैदराबाद संस्थान
      त्या संपूर्ण इलाख्यात. ..' ( पृष्ठ ४४)
कष्टकरी, शेतकरी, मजूर यांची वास्तवातील आजची व्यथा सांगुन कवी मलकमपट्टे पुढे लिहितात -
      ' ज्यांना उमजलं तुमचं जेतवन
       त्यांचा झाला उध्दार
       दिसला नाही आम्हाला कधी
       तुमच्या विहाराचा  घुमट
       म्हणून चाचपडतो आहोत
       रात्रीच्या घनगर्द अंधारात ' (४७)
कवी बाबासाहेबांना पुन्हा येण्याचं आवाहन करतो, असे करणे म्हणजे त्यांच्या शिकवणूकीची आणि तत्त्वांची, विचारांची, कृतीची गरजच अधोरेखित करणे असते. ही गरज सतत वाढती आहे. प्रसंगी कवीचे भावनिक होणेही जाणवत राहते.
      ' ज्यांना व्यवस्थेने नाकारलं
      त्यांची भाषा बोललात तुम्ही!
      दलित आदिवासी बहुजनांची
      आशा बनलात तुम्ही! '( ५१)
डॉ.बाबासाहेबांनी सहज सोप्या शब्दात शेतीचे अर्थशास्त्र अभिव्यक्त केलय. शेतीवरील कराची रचना कशी असावी ते त्यांनी सांगितले ,  हे कवी कवितेत उतरवतो. त्याच बरोबर बाबासाहेबांच्या महानिर्वाणानंतरची स्थिती -
     ' सार्‍याच पक्षाचा     चालू हा धिंगाणा
      आमच्या अंगाना     फक्त माती '
या शब्दात नोंदवतांना दिसतो. ' भारतातील शेतकर्‍यांनो एक व्हा. ' अशी बाबासाहेबांनी हाक दिली पण शेतकरी जातीपातीतही अडकलेले असल्याने एक होऊ शकले नाहीत. कवी परखडपणे लिहीतो - ' जातीच्या कोरड्या या अभिमानाला । कुरवाळणारे आम्ही । कधी होणार शेतकरी म्हणून एक? ' ' जबाबदार सरकारचे दायित्व ' या निबंधाच्या अनुषंगानेही कवी व्यक्त होतो.
    'दशावतारी नाटकातला बळी
     जाताना वामनाच्या पायाखाली
     टाळ्या वाजवणारे आम्ही. ..
      बाबासाहेब,
      आमचं डोकं
      ठिकाणावर आणलं तुम्ही! '( ६९)
कवीचे असे लिहिणे भूमिपुत्रांना भान देणारे ठरते.
     ' इथं सगळेच म्हणतात तुम्हाला
      घटनेचे शिल्पकार
      घटनेतील कलमांचं वाटतं साऱ्यांनाच आकर्षण
     त्यांना काय माहीत
     घटनेतील कलमं आणता येतात
     इकडून तिकडून
     ती कलमं रचण्यात नव्हतं
     तुमचं द्रष्टेपण
     तर तुम्ही बंद केल्या सार्‍या चोरवाटा
     तुमच्या लेखणीने
     हे होतं तुमचं म्हणून असणारं
     खास वेगळेपण
     म्हणून तर
     इतक्या वेळा होऊनही घटनादुरुस्ती
     तुमच्या माघारी
     कुण्या प्रतिगामी मनोवृत्तीला
     भेदता आली नाही
     घटनेच्या पुरोगामित्वाची  चौकट ' (११८)
असे वाचतांना वाचक कवीला नेमके काय म्हणायचे आहे या बाबद क्षणभर संभ्रमित होतो खरा, मात्र कवीने प्रारंभीच्या 'मनोगतात' म्हटल्याप्रमाणे 'या काव्यातुन मी माझ्या आकलनानुसार मला समजलेले बहुजनवादी व भूमिपुत्रांचे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे. ' या विधानातुन हा संभ्रम दूर होतो.
     डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या भूमिपुत्रांसाठी जे कष्ट घेतले, एकुणच समाजाच्या उत्थानासाठी जे उपाय दिले ते आपण समजून घेतले नाही, ते अंगीकारले नाही. त्यामुळे आपले भागध्येय नि वास्तव बदलले नाही. मात्र आता तरी ते अंगीकारावे लागतील. अशी कवीची भावना आहे आणि हेच या दीर्घ कवितेचे मुख्य आशयसुत्र आहे. कवी बाबासाहेबांच्या कार्याचा, धोरणांचा, सुधारणांचा पुनरुच्चार करतो आहे. त्यातुन भूमीपुत्रांना नवे भान देऊ पाहत आहे. आजच्या बिकट परिस्थितीची कारण मीमांसा करतो.  त्यासाठी तो विद्रुप झालेल्या सद्यस्थितीचे चित्रण करतो आणि डॉ. बाबासाहेबांचे कृषी, शेतसारा, सावकारकी, सहकारी पतपेढ्या आणि खरेदी, विक्री मंडळ स्थापणे  आदी संबंधीचे चिंतन, मागण्या आणि विचार यांचा जागर केला असता त्यांना समजून घेतले असते, प्रत्यक्षात आणले असते तर अशी स्थिती निर्माण झाली नसती हे कवी प्राधान्याने मांडतो.
मुळातुन वाचावी,  समजून घ्यावी अशी ही दीर्घ कविता आहे. कवीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची आवश्यकता पटवून देणे, ते समाजाला सद्यकालाचे भान देत समजावून सांगणे ही महत्त्वाची कृती आहे. त्यासाठी भावनाशील आणि भिडणारा कविता प्रकार निवडणे देखील औचित्यपूर्ण ठरले आहे. मुक्त छंद आणि अष्टाक्षरी, षडाक्षरी छंदाचा प्रभावी वापर कवीने केलेला आहे.
•‍ भूमिपुत्रांचे बाबासाहेब : दीर्घ कविता
• कवी : चंद्रशेखर मलकमपटटे
• द्वितीय आवृत्ती : १४ ऑक्टोबर २०२०
• प्रकाशक : ग्रंथाली, मुंबई १६
• पृष्ठे : १२० • मूल्य : १२५ ₹.
~~
डाॅ. कैलास दौंड
kailasdaund@gmail.com
Mo 9850608611

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर